माणूस माणुसकी विसरला कविता l manus manusaki visarla (कवी - अभिषेक जाधव)

कलियुग आलं म्हणता म्हणता कळीच युग आलं,
दुःख याचं आहे की खुपचं वाईट झालं ।
दया, क्षमा, शांतीचा काळ केव्हाच निघून गेला,
एकविसाव्या शतकातला माणूस माणुसकी विसरला ।।१।।

आता डोळ्यांत अश्रू येत नाहीत दुसऱ्याला काटा रुतल्यावर,
हसू मात्र नक्कीच येतं त्याचा चेहरा उतरल्यावर ।
प्रेम, माया, मानवता या शब्दांचा आता विसरच पडला,
एकविसाव्या शतकातला माणूस माणुसकी विसरला ।।२।।

दुसऱ्यासाठी जगणारे आता आहेत फक्तं अपवाद,
अडचणी दिसूनही सर्वांना मदतीला घालावी लागते साद ।
कोणास ठावूक आता दानशुर कर्ण कुठे हरवला,
एकविसाव्या शतकातला माणूस माणुसकी विसरला ।। ३।।

गाडीमधून कुत्रं फिरवणाऱ्याना वाटतो वेगळाच अभिमान,
पण गरिबाच्या स्पर्शाचीही त्यांना वाटतेय घाण ।
प्राणी हवा पण माणूस नको असा जमानाच आला,
एकविसाव्या शतकातला माणूस माणुसकी विसरला ।।४।।

माणूस मेल्यानंतर त्याचे सर्वत्र गोडवे गायले जातात,
जिवंतपणी किंमत देणारे अगदी मोजकेच असतात ।
दुसऱ्यासाठी जगण्याचा आता जणू प्रकारचं संपला,
एकविसाव्या शतकातला माणूस माणुसकी विसरला ।।५।।

काळाच्या ओघात सर्व काही बदललं तसा माणूसही बदलला,
त्याच्या बदलामुळेच मागे इतिहास घडत गेला ।
माणुसकीचा अस्त नको व्हायला आता इतिहासात लिहायला,
एकविसाव्या शतकातला माणूस माणुसकी विसरला ।।६।।



                       कवी - अभिषेक जाधव, सातारा.



(तुमच्या स्वरचित कविता पाठवायच्या असतील तर marathisahitya.in@gmail.com या ईमेल वर पाठवा. त्या येथे तुमच्या नावासह शेअर केल्या जातील.)